अपघाताचा धोका; वाहन दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी
रावेर प्रतिनिधी : निंभोरा ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील कचरा वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या महिंद्रा युवराज २१५ ट्रॅक्टर व ट्रॉलीची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. प्रत्यक्ष बाजारपेठेतून कचरा भरून जातानाचा हा ट्रॅक्टर धोक्याचे निमंत्रण देत आहे. म्हणून या वाहनाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
या ट्रॅक्टरच्या पुढील दोन्ही टायर पूर्णपणे झिजलेले असून, ग्रिप संपलीआहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे ट्रॅक्टरचे ब्रेकही लागत नाहीत. पुढील बंपर गायब असून, इंजिनचे सुटे भाग उघडे पडले आहेत. मिटर, बॅटरी व वायरिंगची अवस्था धोकादायक आहे. चालकाचे आसन (सीट) पूर्णपणे फाटलेले व खराब झालेले असल्याने कर्मचाऱ्यांनामोठ्या त्रासातून काम करावे लागत आहे. केवळ ट्रॅक्टरच नव्हे, तर कचरा वाहणारी ट्रॉलीही पूर्णपणे गंजून सडलेली आहे. ट्रॉलीचे मागील फाटक तुटल्याने वाहतुकीदरम्यान कचरा रस्त्यावर पडत आहे. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. ट्रॉलीवरक्षमतेपेक्षा जास्त कचरा व झाडांचा पाला-पाचोळा भरलेला आहे. हा ट्रॅक्टर शाळा, बाजार व वर्दळीच्या भागातून रोज जातो. ब्रेक नसल्याने व ट्रॉली नादुरुस्त असल्याने कोणत्याही क्षणी मोठा अपघात होऊ शकतो. ग्रामस्थांनी तातडीने या वाहनाची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली आहे.
प्रतिक्रिया
निंभोरा ग्रामपंचायतीवर सध्या प्रशासक मंडळ असल्याने खर्चावर मर्यादा आहेत. मात्र, तरीही आम्ही यासंदर्भात वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने लवकरच ट्रॅक्टरची दुरुस्ती केली जाईल.
- राहुल लोखंडे, ग्रामपंचायत अधिकारी, निंभोरा (ता. रावेर)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा