रावेर पोलिसांची धडक कारवाई; अजंदा रेल्वे ब्रिजजवळील रस्ता लूट प्रकरणातील तीन आरोपींना २४ तासांत अटक, मुद्देमाल जप्त!

 

रावेर प्रतिनिधी :

         रावेर तालुक्यातील अजंदा गावाजवळील रेल्वे ब्रिजजवळ फिर्यादीला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या तीन आरोपींना रावेर पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत गजाआड केले आहे. पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल आणि मोबाईल जप्त केला असून न्यायालयाने आरोपींना ९ जुलै २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.



मजूर देण्याच्या बहाण्याने रचला सापळा 

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख जाबीर शेख अमान (वय ४१, रा. फारुकी आजम कॉलनी, विनावल, ता. रावेर) हे बांधकाम ठेकेदार आहेत. आरोपी मुस्तकीम याने फिर्यादींना फोन करून दोन मजूर मिळवून देण्याचे आश्वासन दिले आणि त्यांना विवरा येथे बोलावून घेतले. मजूर कामासाठी अजंदा गावी गेल्याचे सांगून मुस्तकीम फिर्यादींना अजंदा रेल्वे पुलाजवळ घेऊन गेला.

चाकूचा धाक दाखवून ऑनलाईन लूट

रेल्वे पुलाजवळ आधीच पांढऱ्या रंगाच्या ॲक्टिव्हा गाडीजवळ दोघे जण उभे होते. मुस्तकीमने 'हेच ते मजूर' असल्याचे सांगून फिर्यादींना गाडी थांबवण्यास लावली. मजुरीबाबत बोलण्याच्या बहाण्याने त्यांना शेतात नेण्यात आले. तिथे एका आरोपीने फिर्यादीच्या गळ्यावर चाकू ठेवून पैशांची मागणी केली. खिशातील ५०० रुपये काढून घेतल्यानंतर आरोपींनी फिर्यादीचा मोबाईल हिसकावला आणि फोन पे (PhonePe) चा पिन जबरदस्तीने विचारून दुसऱ्या एका खात्यावर वेळोवेळी ८,००० रुपये ट्रान्सफर करून घेतले व फरार झाले. याप्रकरणी रावेर पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता (BNS) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुप्त बातमीदाराच्या माहितीने फुटला सुगावा 

घटना रात्रीची असल्याने सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपींचे चेहरे अस्पष्ट होते. मात्र, रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना आरोपींच्या गाडीबाबत गुप्त बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे रावेर पोलीस स्टेशनच्या डीबी (DB) पथकाने तातडीने खातरजमा केली असता, आरोपी मुस्तकीम याने गुन्ह्याची कबुली दिली.

तीन आरोपी अटकेत; एक सराईत गुन्हेगार

पोलिसांनी या प्रकरणात खालील तीन आरोपींना अटक केली आहे:१) शेख मुस्तकीम शेख अकील (वय २२, रा. फतेह नगर, रावेर)२) शेख मोईन शेख नईम (वय १९, रा. खिर्डी रोड, विवरा)३) फैजल बेग हितायत बेग (वय १९, रा. शंकर प्लॉट, रावेर, जि. जळगाव)यातील आरोपी शेख मोईन शेख नईम हा सराईत गुन्हेगार असून, यापूर्वीही रावेर पोलीस स्टेशनला त्याच्याविरुद्ध एका वयस्कर व्यक्तीला अशाच प्रकारे लुटल्याचा गुन्हा दाखल आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल (क्र. MH19ED5580) आणि मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयाने दि. ०९/०७/२०२६ पर्यंत पोलीस कोठडी दिली असून त्यांच्याकडून आणखी बरेच लुटीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

या पथकाने केली कारवाई

ही धडक कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक मा. श्री. श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक मा. श्री. संदीप गावीत (जळगाव विभाग), आणि पोलीस उपअधीक्षक मा. श्री. अनिल बडगुजर (फैजपूर विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.कारवाईत रावेर पोलीस स्टेशनचे पो.नि. संदीप पाटील, पो.उप.निरीक्षक मनोज महाजन, पो.उप.निरीक्षक तुषार पाटील, तसेच गुन्हे शोध पथकातील पो.हे.कॉ. समाधान ठाकूर, विशाल पाटील, प्रमोद पाटील, श्रीकांत चव्हाण आणि सुकेश तडवी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या गुन्ह्याचा पुढील तपास पो.उप.निरीक्षक मनोज महाजन करत आहेत.




७५ वर्षीय महिलेचा रावेरमध्ये ट्रकच्या मागील चाकाखाली सापडून जागीच मृत्यू.

        बुऱ्हाणपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात


रावेर प्रतिनिधी. । 

                       रावेर शहरातील बुऱ्हाणपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोल पंपाजवळ रविवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातात ७५ वर्षीय महिलेचा ट्रकच्या मागील चाकाखाली सापडून जागीच मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृत महिलेचे कुटुंब रोजगाराच्या शोधात रावेर येथे आले असल्याची माहिती समोर आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक (क्रमांक HP19G0655) हा पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी जात होता. त्याचवेळी चहा पिऊन परत येत असलेल्या पितांबरबाई शहा बाबुसा शहा (वय ७५) या ट्रकच्या मागील बाजूस आल्या. ट्रक सुरू असल्याचा अंदाज न आल्याने त्या मागील चाकाखाली सापडल्या. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

मदतकार्य केले. त्यानंतर मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनीही रुग्णालयात भेट देऊन घटनेची माहिती घेतली.


या अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीदरम्यान पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.


विशेषतः पेट्रोल पंप परिसरात जड वाहनांची सतत वर्दळ असल्याने अधिक दक्षता घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे एका गरीब कुटुंबाचा आधार हरपला असून परिसरातून शोकभावना व्यक्त होत आहेत. राष्ट्रीय महामार्गावरील अशा दुर्घटना टाळण्यासाठी वाहनचालकांसह पादचाऱ्यांनीही अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता अधोरेखित होत आहे.

आ.अमोलभाऊ जावळे यांच्या प्रयत्नातून रावेर येथे दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वितरण शिबिरास प्रारंभ

रावेर तालुक्यातील दिव्यांग बंधूंना मोठा दिलासा .!


 रावेर (प्रतिनिधी) : 

                      तालुक्यातील दिव्यांग बांधवांची तपासणी व त्यांचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी यांना जळगाव, मुक्ताईनगर या ठिकाणी जावे लागत होते त्या ठिकाणी जाण्या येण्याची होणारी हेड सांड लक्षात घेता आमदार अमोलभाऊ जावळे यांनी शासनाकडे पाठपुरावा करून रावेर येथेच तपासणी व प्रमाणपत्र वितरण शिबिर दर महिन्याला घेण्याची मागणी केली त्या अनुषंगाने रावेर येथे दर महिन्याच्या शुक्रवारी शिबिर ठेवण्यात येणार असून याचा शुभारंभ करण्यातआला. 

                             रावेर ग्रामीण रुग्णालय येथे या शिबिराचा शुभारंभ नगराध्यक्ष सौ संगीता महाजन यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख पाहुणे म्हणून माझी जि प सदस्य गोमती बारेला माझी शिक्षण व आरोग्य सभापती सुरेश धनके माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन अरुण शिंदे नगरसेवक राजेंद्र चौधरी राजे शिंदे अरुण आस्वार भाजपा तालुका अध्यक्ष रवींद्र पाटील युवा तालुका अध्यक्ष उमाकांत महाजन सी एस पाटील नितीन पाटील भूषण महाजन योगेश महाजन आरिफ जमादार बाळा आमोदकर निलेश पाटील अजिंक्य वाणी निलेश सावळे उमेश महाजन शेख मेहमूद हे उपस्थित होते. 

                           प्रास्ताविकात ग्रारुचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वैभव गिरी यांनी या शिबिरा विषयी सविस्तर माहिती दिली दिव्यांग बांधवांची तपासणी करण्यासाठी नोडल अधिकारी डॉ प्रवीण पाटील नेत्ररोग तज्ञ नितीन विसपुते नाकान घसा तज्ञ डॉ विजय कुरकुरे अस्थिरोग तज्ञ डॉ स्वप्निल कळसकर बालरोग तज्ञ डॉ अनिरुद्ध साळुंखे मानसोपचार तज्ञ गजानन परखड फिजिशियन डॉ रुचिका आडे हे उपस्थित होते सुरेश धनके, अरुण शिंदे व पद्माकर महाजन यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की आमदार अमोल जावळे यांच्या प्रयत्नातून सदर शिबिर सुरू झाले असून यापूर्वी देखील डायलिसिस सेंटर सुरू करण्यात आलेले आहे लवकरच उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लागेल असे आश्वासित देखील केले. 

                           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक नगरे यांनी केले तर आभार डॉक्टर स्वप्नील कळसकर यांनी मानले शिबिर सुरू असताना आमदार अमोलभाऊ जावळे यांनी भेट दिली असून लाभार्थ्यांची चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व उपस्थित तज्ञ डॉक्टर मंडळी यांना काही मार्गदर्शक सूचना देखील केल्या यावेळी त्यांच्यासोबत डॉक्टर संदीप पाटील रवींद्र महाजन व सहकारी उपस्थित होते तर शिविर यशस्वीतेसाठी आधीपरिचारिका रिता धांडे, दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष संजय बुवा खजिनदार रजनीकांत बारी उपाध्यक्ष घनश्याम हरणकर बाळू महाजन रमेश चौधरी यांच्यासह दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.



जळगाव मध्ये शरद पवार राष्ट्रवादीच्याबड्या नेत्याच्या "त्या" ज्वेलर्स दुकानावर सीबीआयचा छापा





 

 जळगाव, महाएल्गार न्युज :

                                जळगाव मधून एक मोठी बातमी समोर आली असून जळगावच्या आरएल ज्वेलर्सची सीबीआयकडून पुन्हा चौकशी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. जळगावच्या आरएल ज्वेलर्सची सीबीआय कडून पुन्हा चौकशी करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि माजी खासदार ईश्वर जैन आणि परिवाराच्या असलेल्या आरएल ज्वेलर्ससह मनराज मोटर्स या कंपन्यांची चार वर्षापूर्वी सीबीआयने चौकशी केली होती. अशातच काल (3 जुलै) पुन्हा एकदा सीबीआयचे (CBI) पथक जळगावमध्ये दाखल झाले असून त्यांनी आरएल ज्वेलर्स या कंपनीची चौकशी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.

                                               नेमकं प्रकरण आहे काय ? 

जळगाव येथील प्रसिद्ध राजमल लखीचंद (आरएल) ज्वेलर्सवरं स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ५२५ कोटी रुपयांच्या थकीत कर्जाप्रकरणी (कर्ज घोटाळा) सीबीआय (CBI) आणि ईडी (ED) द्वारे कारवाई करण्यात आली होती. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) दिल्ली सीबीआयकडे तक्रार केली होती, त्यानंतर सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणाच्या आधारे ऑगस्ट २०२३ मध्ये ईडीच्या सुमारे ६० अधिकाऱ्यांनी तब्बल ४५ तास जळगाव येथील आरएल ग्रुपच्या कार्यालयांवर व निवासस्थानांवर छापे टाकले होतेः या कारवाईत कोट्यवधी रुपयांचे सोने, हिऱ्यांचे दागिने आणि रोकड जप्त करण्यात आली होती. ऑक्टोबर २०२३ मध्ये, ईडीने मनी लाँड्रिग (PMLA) कायद्यांतर्गत राजमल लखीचंद ग्रुपशी संबंधित जळगाज, मुंबई, ठाणे येथील सुमारे ३१५ कोटी रुपयांच्या ७० मालमत्ता जप्त केल्या होत्या.

 

जळगाव मधील राजमल लखीचंद (RL) ग्रुपच्या 'आरएल ज्वेलर्स' आणि इतर संबंधित कंपन्यांवर स्टेट बँकेची ३५२.४९ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयने (CBI) छापे टाकले आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांच्या पथकांनी संचालक व राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्याशी संबंधित कार्यालये व घरांची झाडाझडती घेऊन कागदपत्रे व लॉकरच्या चाव्या ताब्यात घेतल्या आहेत. मार्च २०२५ मध्ये, राजमल लखीचंद ज्वेलर्सने आपली फसवणूक केली नसल्याचे स्टेट बँकेने स्पष्ट केल्याचे संचालक व माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी जाहीर केले होते. अशातच काल पुन्हा आरएल ग्रुपच्या आरएल ज्वेलर्स या कंपनीची सीबीआयने चौकशी सुरू केली असून काही कागदपत्र आणि लॉकरची चाबी ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. सीबीआयच्या या चौकशीच्या फेऱ्या सुरू असतानाच, माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी बँकेचे दावे फेटाळून लावले आहेत आणि जैन समूहाने या प्रकरणात कोणतीही फसवणूक केली नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र स्टेट बँकेने केलेले दावे ही चुकीचे असून, स्टेट बँकेने दिलेल्या कर्जाच्या पेक्षा जास्त रक्कम आपल्याकडून वसूल केली असल्याने, आपलेच पैसे स्टेट बँकेकडे निघत असल्याचा दावा करत, सीबीआय चौकशी करत असली तरी त्यात कोणतेही तथ्य त्यांना मिळणार नसल्याचं ईश्वरलाल जैन यांनी म्हटल आहे.

निंभोरा ग्रामपंचायतीच्या कचरा ट्रॅक्टर ट्रॉलीची झाली दुरवस्था

 अपघाताचा धोका; वाहन दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी


रावेर प्रतिनिधी : निंभोरा ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील कचरा वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या महिंद्रा युवराज २१५ ट्रॅक्टर व ट्रॉलीची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. प्रत्यक्ष बाजारपेठेतून कचरा भरून जातानाचा हा ट्रॅक्टर धोक्याचे निमंत्रण देत आहे. म्हणून या वाहनाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

या ट्रॅक्टरच्या पुढील दोन्ही टायर पूर्णपणे झिजलेले असून, ग्रिप संपलीआहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे ट्रॅक्टरचे ब्रेकही लागत नाहीत. पुढील बंपर गायब असून, इंजिनचे सुटे भाग उघडे पडले आहेत. मिटर, बॅटरी व वायरिंगची अवस्था धोकादायक आहे. चालकाचे आसन (सीट) पूर्णपणे फाटलेले व खराब झालेले असल्याने कर्मचाऱ्यांनामोठ्या त्रासातून काम करावे लागत आहे. केवळ ट्रॅक्टरच नव्हे, तर कचरा वाहणारी ट्रॉलीही पूर्णपणे गंजून सडलेली आहे. ट्रॉलीचे मागील फाटक तुटल्याने वाहतुकीदरम्यान कचरा रस्त्यावर पडत आहे. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. ट्रॉलीवरक्षमतेपेक्षा जास्त कचरा व झाडांचा पाला-पाचोळा भरलेला आहे. हा ट्रॅक्टर शाळा, बाजार व वर्दळीच्या भागातून रोज जातो. ब्रेक नसल्याने व ट्रॉली नादुरुस्त असल्याने कोणत्याही क्षणी मोठा अपघात होऊ शकतो. ग्रामस्थांनी तातडीने या वाहनाची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली आहे.

प्रतिक्रिया

निंभोरा ग्रामपंचायतीवर सध्या प्रशासक मंडळ असल्याने खर्चावर मर्यादा आहेत. मात्र, तरीही आम्ही यासंदर्भात वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने लवकरच ट्रॅक्टरची दुरुस्ती केली जाईल.

- राहुल लोखंडे, ग्रामपंचायत अधिकारी, निंभोरा (ता. रावेर)